नैतिक कथा - आत्मनियंत्रणाचे महत्त्व
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणाऱ्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी जनविणे इ. प्रकारांत तो निपुण झाला. . परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे.
या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले.
मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहीत असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहीत असते.
पण जो ज्ञानी आहे, तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो, मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य - ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो..