यशाचा पासवर्ड - क्षमता (Capacity)
आपल्या पूर्ण क्षमतांचा तीव्रतेने वापर करणं म्हणजेच यश गाठणं !
Cover Topics :
1) अयशस्वी होणार्यांना मुळात आपल्यातील क्षमतांचा बोधच झालेला नसतो.
2) माणसाची शेपटी हळूहळू नामशेष का झाली ?
३) माणसांनी स्वतः ची १०० टक्के क्षमता वापरली तर ?
4)लहानपणी पोलिओमुळे अपंग झालेल्या मुलीने पोहण्यात ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक कसे कमावलं ?
क्षमता प्रत्येकाच्या अंगी असतेच. या क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं कि, योग्यता कमावता येते. क्षमता जाणीवपूर्वक घडवता, वाढवता येते. मग ती अफाट कष्ट करणारी कार्यक्षमता असेल. ज्ञानसंचय करणारी बौद्धिक क्षमता असेल. एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगातील निर्णयक्षमता असेल किंवा काही वेगळं निर्माण करण्याची कल्पनाशमता असेल. यापैकी काहीना काही प्रत्येकात असतंच. याच क्षमता सामर्थ्य बनून यशोशिखरावर नेतात तर याच क्षमता अभावी माणसं जीवनात अयशस्वी होतात.
अयशस्वी होणार्यांना मुळात आपल्यातील क्षमतांचा बोधच झालेला नसतो. माणसांना काही करून दाखवावंसं वाटतं. कोणीतरी व्हावंसं वाटतं. पण त्यासाठी आवश्यक असते आपल्यातील क्षमता ओळखण्याची दृष्टी ! त्यासाठी आपण स्वतःच एकदा अलिप्तपणे स्वतः चा अभ्यास करावा. स्वतःलाच स्वतः ची ओळख पटवून द्यावी. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, हे जाणून घ्यावं. ते ध्यानात आलं, कि मग आपल्यातील सामर्थ्याला अधिक सामर्थ्यवंत करता येतं. दुबळ्या जागांचा विकास साधत त्यांनाही सामर्थ्यापर्यंत आणता येतं. प्रयत्नपूर्वक, सातत्याच्या सरावाने आपल्यातील क्षमतांना धार लावता येते. मग त्याचा बळावर जग जिंकता येतं.
2) माणसाची शेपटी हळूहळू नामशेष का झाली ?
मात्र काहीच न करता क्षमता विकसित होत नाही. वापर झाला, केला तरच कुठली गोष्ट अस्तित्वात राहतेच, पण प्रबळही बनते. वापर न झाल्यामुळेच माणसाची शेपटी हळूहळू नामशेष झाली, असे जीवशास्त्रीय उत्क्रांतीवाद सांगतो. एखाद्या अवयवांचं असे होत असेल, तर वापराविना क्षमतांचही असंच होईल. विल्यम जेम्स यांच्या मते लोक आपल्या क्षमतेच्या १० ते १२ टक्केच क्षमता वापरतात. तर अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein ) म्हणतात, मी माझ्या बौद्धिक क्षमतेपैकी फक्त २५ टक्के क्षमता वापरली !
३) माणसांनी स्वतः ची १०० टक्के क्षमता वापरली तर ?
म्हणजे माणसांनी स्वतः ची १०० टक्के क्षमता वापरली, तर किती प्रचंड कार्य उभं राहू शकेल! पण माणसं नानाविध कारणं सांगतात. अगदीच वेळ पडली तर बघतो करून ! बघतो जमलं तर ! करतो प्रयत्न ! असं म्हणत काही करू पाहतात. पण अशा मानसिकतेतून काहीच घडत नाही. पूर्ण ध्येयनिष्ठेनं, अत्यंत उत्कटतेने आणि तीव्रतेच्या क्षमता सामर्थ्याने जेव्हा काही करू पाहाल, तेव्हा यश मिळतंच. ते मिळालं कि मग कळतं, अरे आपल्यात जिंकण्याची क्षमता होती. तर ! खरं तर जिंकण्याची क्षमता प्रत्येकात असतेच आणि जो ती वापरतो.... तो जिंकतो....!
4) लहानपणी पोलिओ मुळे अपंग झालेल्या मुलीने पोहण्यात ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक कसे कमावलं ?
लहानपणी पोलिओ मुळे अपंग झालेल्या 'शेली मान' हिने पायातील शक्ती मिळवण्यासाठी वयाच्या पाचव्या वर्षांपासून पोहायला सुरुवात केली. प्रयत्नपूर्वक तिने क्षमता कमावली. विकसीत केली. एवढच नव्हे तर तिने अनेक जागतीक विक्रम मोडले. मेलबॉर्न च्या ऑलिंपिक (olympic games) मध्ये सुवर्णपदक हि कमावलं. तेव्हा कुणाला सांगून विश्वास बसला नाही, कि ती पोलिओ मुळे अपंग आहे !
अशी अफाट क्षमताच माणसाला अफाट बनावट असते. इतरांपेक्षा वेगळे घडायचं, तर अशा क्षमता विकसित करायला हव्यात. त्या विकसित करणारी माणसंच यशाकडे झेपावत असतात...!
जंगल वाट्याने एकदा चवताळलेला वाघ आडवा आला कि, काळजाचा थरकाप उडतो आणि क्षणात आपण जिवाच्या आकांताने बेभान पळत सुटतो. इतके वेगात की बस्स....!! त्या अफाट वेगामुळे वाघाच्या तावडीतून बचावल्यावर आपल्याला साक्षात्कार होतो, अरे ! आपण इतक्या वेगात पळू शकतो ? आपली वेगाची क्षमता तेव्हा कळते.
आपण काय करू शकतो याची जाणीव होणं, म्हणजेच स्वतःच्या क्षमतेची ओळख पटणं आणि ओळख पटलेल्या क्षमतांचा, वाघाच्या तावडीतून बचावण्यासाठी ज्या तीव्रतेने पळाला, त्या तीव्रतेने वापर करणं म्हणजे यश गाठणं होय....!
क्षमता तुमच्यात आहेतच त्या कळण्यासाठी वाघच समोर यायला कशाला हवा ? यशाच्या दिशेने पळुन तर बघा... यश तुमचंच असेल...!!!
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
सदर
लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात
परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून
पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध
पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.